मुंबई : राज्याचे नाव उज्वल केलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंना आणि मार्गदर्शकांना देण्यात येणाऱ्या पारितोषिक रक्कमेत दहापट वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी घेतला आहे.
हँगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदकास 1 कोटी रूपये, मार्गदर्शकास 10 लक्ष, रौप्यपदक विजत्या खेळाडूंसाठी 75 लक्ष रूपये, मार्गदर्शकास 7 लक्ष 50 हजार रुपये, कांस्यपदक प्राप्त खेळाडूस 50 लक्ष रुपये तर मार्गदर्शकास 5 लक्ष रुपये रोख बक्षिस देण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय सरकारने घेतला आहे.
तसेच सांघिक क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त खेळाडूस 75 लक्ष, मार्गदर्शकास 7 लक्ष 50 हजार, रौप्यपदक विजत्या खेळाडूस 50 लक्ष, मार्गदर्शकास 5 लक्ष तर कांस्यपदक विजेत्यास 25 लक्ष, मार्गदर्शकास 2 लक्ष 50 हजार देण्यात येणार असून याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला.
त्याच बरोबर आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहनपर 10 लाख रुपये देण्यात येणार आहेत. त्यामुळे खेळाडू आणि मार्गदर्शकांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळेल.