मुंबई : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरंगे पाटील यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, 24 डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास कोणकोण 20 वर्षे ओबीसी आहेत आणि ओबीसी म्हणून ज्यांनी आरक्षण दिले व घेतले त्यांची नावे जाहीर केली जातील, असे म्हटले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता मराठा-ओबीसी संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेत ओबीसींना बाहेर ढकलण्याचे षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मराठा समाजाचे नेते बाळासाहेब सराटे यांनी ओबीसी आरक्षणाबाबत दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीसाठी मंत्री भुजबळ आज मुंबई उच्च न्यायालयात हजर होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला.
यावेळी भुजबळ म्हणाले की, मराठा समाजाला कायदेशीर मार्गाने आरक्षण देता येणार नाही. त्यामुळे मागच्या दाराने कुणबी प्रमाणपत्र देऊन अशा काही लोकांना एका बाजूने घेऊन ओबीसीमध्ये सामील केले गेले आहे आणि दुसऱ्या बाजूला जे ओबीसी आहेत त्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात लढा देऊन त्यांना ओबीसीतून बाहेर ढकलण्याचा दुहेरी कार्यक्रम सुरू आहे. आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत. आमची कायदेशीर आणि राजकीय लढाई सुरू असल्याचे भुजबळ म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, मराठा समाजाला ओबीसीत जाऊन सर्व प्रकारचे आरक्षण हवे आहे आणि त्यांनाही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आरक्षण हवे आहे. कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यावर त्यांच्या पत्नीच्या 150 आणि त्यांच्या कुटुंबातील 200 लोकांना ते मिळेल. असे केल्याने सर्वजण आपोआप कुणबी होतील. एकदा कुणबी झाल्यावर ते ओबीसीमध्ये आले की मग त्यांना शिक्षणातील, नोकऱ्यातील आणि राजकारणातील सर्व हक्क आपोआप मिळतील. सध्या 375 जाती आहेत. यात मराठा समाज आला तर कोणाला काही मिळणार नाही आणि त्यामुळे ओबीसी संपणार असल्याचेही भुजबळ म्हणाले.
तसेच मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. तुम्ही त्यांना वेगळे आरक्षण द्या. कायद्यात काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करा आणि सर्वोच्च न्यायालयात लढा. आम्हीही मराठा आरक्षणाच्या बाजूने मतदान केले आहे. त्यामुळे त्यांना वेगळे आरक्षण द्यावे, मात्र आता थेट ओबीसीतून सरसकट आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे, असे भुजबळ म्हणाले.
बच्चू कडू यांचा भुजबळांना विरोध
छगन भुजबळ यांच्या भूमिकेला आमदार बच्चू कडू यांनी विरोध केला आहे. मराठा कुणबी नाही तर कोण? मराठा समाज पाकिस्तान आणि अमेरिकेतून आला होता का? मराठा हे कुणबी आहेत. काही लोक मते पाहून समाजात दरी निर्माण करून राजकीय पोळी भाजत आहेत. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे, असे माझे मत आहे.
छगन भुजबळ हे अभ्यासू नेते आहेत. महात्मा फुले यांनी कुणबी, माळी, मराठा हे भाऊ असल्याचे म्हटले आहे. त्यांना वेगळे करू नका. सर्व अठरा पगड जाती मराठा आहेत. मराठा ही सामूहिक संज्ञा आहे, जात नाही. बच्चू कडू यांनी मराठा हे कुणबीच असल्याचे म्हटले आहे.
Read More
मराठा आरक्षणासाठी 24 तासात दोन आत्महत्या, मनोज जरांगे यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा