मुंबई, 1 सेप्टेंबर | विरोधी पक्षांनी एकत्र येऊन ‘इंडिया’ नावाची आघाडी स्थापन केली असून या आघाडीची दोन दिवसीय बैठक मुंबईत पार पडली. बैठकीचा समारोप करताना आज पत्रकार परिषदही घेण्यात आली. यावेळी ‘इंडिया’ आघाडीच्या विविध नेत्यांनी आपली भूमिका मांडली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पत्रकारांशी बोलताना मोदी सरकारवर हल्लाबोल करत राष्ट्रवादीतून बंडखोरी करणाऱ्या अजित पवार यांच्या गटावरही निशाणा साधला.
आम्ही चुकीच्या मार्गावर जाणार नाही आणि जे चुकीच्या मार्गावर गेले आहेत, त्यांनाही आम्ही योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करू पण ते योग्य मार्गावर यायला तयार नसतील तर आम्ही त्यांना बाजूला करू, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या बंडखोर गटाला शरद पवार यांनी नाव न घेता इशारा दिला आहे.
राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शंका उपस्थित होत असतानाच शरद पवारांनी भारत बैठकीत असा आक्रमक पवित्रा घेतल्याने अजित पवार गटाची डोकेदुखी वाढणार आहे.
लालू प्रसाद यादव यांची फटकेबाजी
‘इंडिया’च्या बैठकीत बोलताना राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यांनीही त्यांच्याच शैलीत भाजपवर तोंडसुख घेतले. शास्त्रज्ञांच्या मेहनतीमुळे भारत चंद्रावर पोहोचला आहे.
पण मी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना आवाहन करणार आहे की त्यांनी पंतप्रधान मोदींना सूर्यावर नेऊन सोडावे, जेणेकरून मोदींची जगभरात ओळख होईल, असे लालू प्रसाद यादव म्हणाले. दरम्यान, अजित पवार यांच्यासह सहकाऱ्यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
या पार्श्वभूमीवर लालूप्रसाद यादव यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना शरद पवारांचा उल्लेख करत आम्ही सर्व ताकदीनिशी पवारांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. पवारांनी पुन्हा पक्ष मजबूत करावा अशी आमची इच्छा आहे, असेही लालूप्रसाद यादव म्हणाले.
Read More
शरद पवार यांचा मोठा निर्णय : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे